मागोवा म्हणजे धांडोळा घेणे. उगम, विकास आणि प्रवास ही इतिहाससंशोधनाची पद्धती आहे. धर्म अथवा ईश्वरी कल्पना अनेकदा कथा, पुराणे, आख्यायिका आणि परंपरांच्या माध्यमातून पिढ्यान् पिढ्या सहज पुढे सरकत राहतात. परंतु नास्तिकता ही तर्क आणि चिकित्सेची परंपरा असल्याने ते तत्त्वज्ञान तितक्याच सहजतेने लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच भारतीय नास्तिकतेचा हा मागोवा नजरेखालून घातला पाहिजे. ‘नास्तिक’ हा शब्द आजही अनेकदा संशय आणि सामाजिक वैगुण्याशी जोडला जातो. ईश्वरकल्पनेला स्पष्टपणे आणि जाहीरपणे नकार देणे म्हणजे जणू भारतीय संस्कृतीपासून दुरावणे, आणि नास्तिकता ही पाश्चिमात्य विचारांची उसनी देणगी आहे, असा गैरसमज अनेकांच्या मनात दृढ आहे. हे पुस्तक त्या गैरसमजांना तर्क आणि सुलभ मांडणीने छेद देते. सांख्य, बौद्ध, जैन, आणि चार्वाक असा हा लांबरुंद प्रवास आहे. आणि नेमकेपणाने यातील फरक मांडला आहे. भारतीय तत्त्वपरंपरेतील नास्तिक्याचा, धर्मचिकित्सेचा आणि स्वतंत्र बुद्धीला दिलेले स्थान याचा या पुस्तकात सुलभ आणि अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. भारतीय वैचारिक परंपरा ही केवळ श्रद्धेची नव्हे, तर प्रश्न विचारण्याची, तर्क करण्याची आणि प्रस्थापित मतांची चिकित्साही करण्याची परंपरा आहे, याची जाणीव हे पुस्तक करून देते.
ज्येष्ठ लेखक आणि विवेकवादी चळवळीतील आपले सहकारी जगदीश काबरे सरांनी हा गुंतागुंतीचा विषय सर्वसामान्य वाचकालाही सहज समजेल अशा भाषेत उलगडून सांगितला आहे. बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांच्या संघटनेचा सदस्य म्हणून मला वाटते की, हे पुस्तक संघटनात्मक कार्यालादेखील एक संदर्भरेषा ठरेल. हे कुमार नागे
सचिव, ‘ब्राईट्स सोसायटी’ व ‘मधुरजग फाउंडेशन’ संचालक, ‘विचारवेध’
Pickup available at HO
Usually ready in 24 hours