कर्तृत्वाची तेजस्वी परंपरा, आदर्शाचे भक्कम अधिष्ठान आणि उच्चतम शिक्षणाची व्यापकता यांच्या त्रिवेणी संगमातून घडलेले असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात. सैनिकी सेवेत शौर्य, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचा मानदंड प्रस्थापित करणारे लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात हे त्यांचे वडील; तर जुन्या मुंबई राज्याचे पहिले भारतीय कृषी संचालक आणि पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य म्हणून कृषी शिक्षणाला नवी दिशा देणारे रावबहादूर पी.सी. पाटील हे त्यांचे आजोबा. या उज्वल कौटुंबिक वारशाने थोरात यांच्या मनात शिस्त, कर्तव्यनिष्ठा, समाजाभिमुखता आणि उच्च जीवनमूल्यांवरील श्रद्धा खोलवर रुजवली.
हा लेखसंग्रह त्यांच्या जीवनप्रवासाचा एक आत्मीय, चिंतनशील आणि पारदर्शी आलेख आहे. संस्कारांनी उजळलेले बालपण, स्वप्नांनी भारलेले तरुणपण आणि व्यामिश्र अनुभवांनी परिपक्व झालेले प्रौढत्व या जीवनाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांचे नितळ, भावस्पर्शी आणि अर्थगर्भ चित्रण येथे साकारलेले प्रत्ययास येते.
प्रखर नैतिकता, माणुसकीवरील अढळ विश्वास आणि सकारात्मक जीवनदृष्टी यांचा हृदयस्पर्शी संगम या लेखनात पाहावयास मिळतो. थोरात यांनी मूळ इंग्रजीत लिहिलेल्या या लेखांचा मराठी अनुवाद रघुनाथ कडाकणे यांनी अतिशय मर्मग्राही, प्रवाही आणि तितक्याच सुबोध रितीने केलेला आहे. सहजपणे अंतर्मुख करणाऱ्या, विचारांना नवी दिशा देणाऱ्या आणि जीवनाकडे नव्या आशावादाने पाहण्याची प्रेरणा देणाऱ्या या 'मनातल्या गोष्टी' वाचकांच्या मनातही दीर्घकाळ गुंजत राहतील यात शंका नाही.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours