जयश्री काळे यांना “जागृती” या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात करून फेब्रुवारी २०२३ मध्ये २५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने संस्थेच्या कामाचा, स्वत:च्या अनुभवांचा आणि एकूणच जडणघडणीचा एक लेखाजोखा त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. ज्ञानपीठ विजेते मराठी कवी विंदा करंदीकर हे जयश्री काळे यांचे वडील.
आयुष्याच्या सुरुवातीला आपल्या आई वडीलांनी अंगी बाणावलेले सामाजिक भान, इतरांना निरपेक्ष भावनेने मदत करण्याची वृत्ती आणि विवाहानंतर या सगळ्याला प्रोत्साहन आणि चालना देणारे सासू सासरे यांच्या संस्कार आणि पाठिंब्याचे ऋण जयश्रीताई वेळोवेळी या पुस्तकात मान्य करतात. यानंतरच्या अनेक प्रकरणांमध्ये जागृती या संस्थेच्या कामाचा, संस्थेने हाताळलेल्या विविध प्रश्नांचा आढावा जयश्री काळे यांनी छोटेखानी लेखांमधून घेतला आहे. यात कुठेही श्रेय घेण्याची धडपड नाही, परोपकाराची भावना नाही.
या पुस्तकाच्या शेवटी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची छायाचित्रे आणि सांख्यिकीय माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्येष्ठ लेखक, संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. ते आपल्या प्रस्तावनेच्या शेवटी म्हणतात, “ एका बाजूनी म्हणावं तर हे जयाचं आत्मचरित्र आहे, म्हणावं तर ही जागृतीची कहाणी आहे आणि या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेतच पण त्याचबरोबर आपल्याला या पुस्तकात या समाजाचं, त्यातल्या सुखदुःखांचं त्यातल्या गरजवंतांचं, त्यातल्या अनेक प्रश्नांचं आणि ते सोडवण्यासाठी मदत करण्यासाठी उभं राहणाऱ्यांचं एक जिवंत चित्रही जया आपल्यासमोर चितारते.” हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours