खलिस्तान म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर अनेक वेगवेगळी चित्रं उभी राहतात; त्यात एकेकाळी घडलेलं ऑपरेशन ब्लू स्टार असैल, इंदिरा गांधींची हत्या असेल किंवा पंजाबला ग्रासून टाकलेला दहशतवाद असेल. अलीकडच्या काळात ब्रिटन आणि कॅनडामध्ये जी खलिस्तानी चळवळ वाढते आहे, त्याला तेथील राज्यव्यवस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कशी मदत करते, याचे विस्तृत विवेचन आपल्याला ‘खलिस्तानचे कारस्थान’ या पुस्तकात वाचायला मिळते; तसेच त्याचे पडसाद इतर देशांमध्येदेखील कसे पडत आहेत ते पाहायला मिळतात. ही चळवळ कशी निर्माण झाली, कशी वाढली आणि कशा स्वरूपाच्या समस्या निर्माण केल्या, याचे अत्यंत परखड विवेचन श्री. अरविंद व्यं.
गोखले यांनी त्यांच्या या पुस्तकात केलेले आहे. त्यांनी या पुस्तकात अनेक वेगवेगळे प्रसंग चर्चिले आहेत, त्यात शेतकरी चळवळ, सध्याची पंजाबमधली राजकीय परिस्थिती किंवा खलिस्तानवादी आणि पाकिस्तान यांचे जवळचे संबंध आहेत. या सर्व प्रसंगांचे विश्लेषण करताना, त्यातले बारकावे सांगताना आणि ते प्रसंग डोळ्यांसमोर उभे करताना, तो विषय अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि त्याचबरोबर सोप्या भाषेत सांगण्याचे कौशल्य गोखल्यांमध्ये आहे. एकेकाळी केसरी आणि लोकसत्तेचे संपादक असलेले ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले यांनी लंडन आणि वॉशिंग्टन डी.सी.मध्ये अभ्यास आणि संशोधन केले आहे.
संशोधनाचा हा अनुभव त्यांच्या लिखाणामध्ये नेहमीच दिसून येतो. हे पुस्तक केवळ माहितीवजा नसून, यातून खलिस्तानच्या समस्येची व्यापकता व त्याचे धोके नेमके समजतात. डॉ. श्रीकांत परांजपे (संरक्षणशास्त्रतज्ज्ञ) हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours