प्रारब्ध' या कथासंग्रहात दहा कथा आहेत. त्यांचे विषय नियती, भाग्य, प्राक्तन, दैव, प्रारब्ध असे आहेत. एकाच विषयावर जरी ह्या कथा आहेत तरी कथांच्या विषयांची वैविध्यता आणि त्यामागची लेखकाची प्रांजळ भूमिका यामुळे या कथा एकसुरी वाटत नाहीत. हे या कथासंग्रहाचे खरे यश आहे.
जीवनसंघर्ष हा 'प्रारब्ध' या कथासंग्रहाचा आत्मा आहे. नियतीशरणता इथे लेखकाला अभिप्रेत नाही. उलट नियतीशी झगडत आपले जीवन सुंदर केले पाहिजे, हा बोध देणारा हा कथासंग्रह आहे. त्यांच्या कथांना वास्तवतेची जोड मिळाल्यामुळे ह्या कथा अस्सल वाटतात. मानवी जीवनाचे द्वंद्व लेखकाने दमदारपणे रेखाटले आहेत. त्यांच्या कथा निराशेच्या गर्तेतून सहज सुटका करण्याचा मार्ग दाखवणाऱ्या आश्वासक कथा आहेत.
कथांची सुरुवात आकर्षक व उत्तम झाली आहे. त्यांमध्ये मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू आहेत. काही कथा वाचकाच्या पापण्या ओल्या करणाऱ्या आहेत तर काही कथा चेहऱ्यावर हसू फुलवतात.
प्रसंगानुरूप चित्रपट गीतांचा वापर करून कथा मनोरंजक केल्या आहेत. शेतकऱ्यांचे दुःख-दैन्य, तरुणांची बेकारी, ससेहोलपट पोटतिडीकेने मांडली आहे. कॉलेजजीवनाच्या सुंदर व्याख्या या कथासंग्रहात आहेत. सुविचारांची पखरण केली आहे. म्हणींचा उत्तम उपयोग केला आहे. तरी प्रत्येक रसिक वाचकाने ह्या कथा एकदा तरी जरूर वाचाव्यात अशाच आहेत.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours