विस्मरणात गेलेली नाटके हा डॉ. अरविंद वामन कुलकर्णी यांचा शोधमूलक, विश्लेषणात्मक आणि चिकि त्सक नाट्यसमीक्षा असणारा ग्रंथ. या ग्रंथात महात्मा फुले यांच्या ‘तृतीय नेत्र’ (१८५५) नाटकापासून पु. भा.
डोंगरे यांच्या ‘संगीत चंद्रहास’(१९०३) नाटकापर्यंतच्या क्रमाने बारा महत्त्वाच्या नाटकांवर विस्तृत असे शोधसमीक्षालेख समाविष्ट आहेत. अरविंद वामनांनी हे लेख स्वतंत्रपणे लिहिलेले असले तरी एकोणिसाव्या शतकातील नाटक व नाट्यविचार यांचे एक समान सूत्र या सर्वच लेखामागे आहे. त्यामुळे मराठी नाटक व रंगभूमी यांचा आरंभपर्वातील अर्धशतकाचा इतिहासच येथे आलेखित झाला आहे. एकोणिसाव्या शतकात आरंभकालीन आधुनिक मराठी नाटक ‘घडत’ही होते आणि त्याचवेळी ते उग्र अशा समकालीन सामाजिक समस्यांना धीटपणे सामोरेही जात होते.
त्या शतकात महाराष्ट्रामध्ये नाटक व रंगभूमी यांविषयी जे एकूण घनघोर असे मंथन झाले, त्याचा आवाका केवढा थोरला होता हे अरविंद वामनांच्या येथील विवेचनावरून कळत राहते. त्या काळात समाजाच्या विविध स्तरांतील शिक्षित, अर्धशिक्षित मंडळी नाटके लिहीत व करीत होती; समीक्षक मंडळी त्यांची कसून समीक्षा करीत होती आणि या आंतरक्रियेत रसिकवर्गही मनापासून सामील होत होता. या साऱ्यांतून नाटक व रंगभूमीविषयक चळवळीचे जे एक सळसळते वातावरणच त्या आरंभपर्वात तयार झाले होते. त्याचा फार चांगला अनुभव अरविंद वामनांचा हा लेखसंग्रह देतो. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours