Skip to product information
Vivekayatri | विवेकयात्री by Dr Abhijit Vaidya | डॉ अभिजित वैद्य
Sale price  Rs. 999.00 Regular price  Rs. 1,100.00
Overview:
विवेकवाद या संकल्पनेची दोन अंगे आहेत, पहिले अंग बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञानवादाशी नाते सांगते, तर दुसरे अंग नैतिकतेशी नाते सांगते. या सर्व संकल्पनांच्या मांडणीची वाटचाल पाश्चात्त्य आणि पौर्वात्य तत्त्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्रपणे समजावून घ्यावी लागेल. पण तत्त्वज्ञानाच्या विविध प्रवाहांपेक्षा मला भुरळ घालतात ते या पायवाटेने चालणारे, जगाला समृद्ध करणारे तत्त्वज्ञ, त्यांची आयुष्ये, त्यांची घडण, त्यांच्या काळातील परिस्थिती आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेला वैचारिक प्रवास. त्यांचा हा प्रवास विश्वाची, निसर्गाची, मानवी मनाची रहस्ये शोधण्याची; मानवी मन, बुद्धी आणि आकलन यांच्या कार्यपद्धती शोधण्याची अविश्रांत धडपड आहे. यातून तत्त्वज्ञानाचे अनेक प्रवाह, पंथ आणि मानवी जीवनाला सुसूत्रता देण्यासाठी धर्मही निर्माण झाले. विज्ञानानेही जन्म घेतला तो यातूनच. यातूनच धर्म आणि विज्ञान असे द्वंद्व उभे राहिले. आदिम धर्म संघटित झाले आणि हे धर्म बघताबघता अंधश्रद्धा, कर्मकांडे, पुरोहितशाहीमध्ये अडकत शोषणाचे आणि हिंसेचे स्रोत बनले. धर्म आणि राजसत्ता असा संघर्ष उभा राहिला. कधी धर्म राजसत्तेला वापरीत पुढे गेला, कधी धर्म स्वतः सत्ता बनला, तर कधी राजसत्तेने धर्माला वापरले. विज्ञान जन्माला आले आणि धर्मसत्तेचे आसन डळमळले. सत्ता टिकवण्यासाठी धर्म आणि विज्ञान या दोघांचा वापर करीत राजसत्ता पुढे निघाली आणि आपले स्थान बळकट करण्यासाठी धर्माने विज्ञान आणि राजसत्ता या दोघांना हाताशी धरले. विज्ञानही प्रगत होत गेले, तसे उपभोग आणि विध्वंसाचे माध्यम बनत गेले. धर्म, राजसत्ता आणि विज्ञान या सर्वांनीच मानवतेपासून फारकत घ्यायला सुरुवात केली. या प्रचंड गुंतागुंतीच्या वाटचालीत मानवजातीची वाटचाल अधिक चांगली व्हावी, यासाठी अनेक दीपस्तंभ आपल्या प्रकाशकिरणांनी या वाटा उजळून टाकीत होते. आणि भविष्यातही असे दीपस्तंभ निर्माण होत राहतील आणि या वाटा उजळत राहतील. पण आपली संपूर्ण आयुष्ये चिंतन, मनन आणि संशोधन यासाठी वेचणाऱ्या या दीपस्तंभांना आपल्या तेजाने या वाटा कशासाठी उजळायच्या होत्या? या वाटांना झाकोळून टाकणाऱ्या अंधाराची कोणती जाळी फिटावीत आणि कोणते आकाश मोकळे व्हावे, यासाठी आपली आयुष्ये ते जाळीत आले? माणूस कुठे पोहोचावा, हे त्यांना अभिप्रेत होते? कशाचा ध्यास त्यांनी घेतला होता? विवेकी जगाचे कोणते स्वप्न ते पाहत होते? विवेक म्हणजे काय? त्याच्या शोधाचा जगाचा हा प्रवास असाच चालू राहणार का? का जगाला विवेक हुलकावण्याच देत राहणार आणि जग विवेक आणि अविवेक यांच्या निरंतर चक्रात फिरत राहणार? या वाटचालीचा शोध म्हणजेच 'विवेकयात्री'! माणसाच्या सुमारे पाच हजार वर्षांच्या विवेकवादाच्या वाटचालीचा आणि विवेकाचा शोध घेणाऱ्या दिग्गजांचा शोध घेण्याचा हा नम्र प्रयत्न आहे.  

You May Also Like