भाषाशैलीचा पिळदार घाट आणि गोळीबंद आशय यांचे कसदार रसायन असलेली कविता केशव सखाराम देशमुख यांनी लिहून, नव्या पिढीच्या मराठी कवितेत एक सतर्क नवे भान जन्माला घातले आहे. शेतीत झुंजणार्या श्रमिक माणसांची कष्टगाथा साकार करणारी त्यांची कविता; माणूस आणि माती यांच्या स्वाभिमानसंपन्न जीवनाचा नवा अर्थ जगाला सांगते. खेड्यांतील जुनी आणि नवी पिढी यांच्यातल्या मूलभूत, ठळक बदलांची सजग दखल घेणारी ही कविता जशी गंभीर आहे; तशीच अर्थसंपन्नही.
याआधी ‘पाढा’ आणि ‘चालणारे अनवाणी पाय’ ह्या दोन कवितासंग्रहांतील देशमुखांच्या कवितेने ग्रामसंस्कृतीतल्या समर्पक संगराची पेरणी करून एक भीषण वास्तव उजागर केले. आता ह्या ‘अथक’ कवितासंग्रहातली कविता गाव आणि शिवारात धुमसणार्या संगराची नवी समर्पक मांडणी करते. जेव्हा मातीच पेटते आणि अवघे वास्तव विस्तवाच्या रूपात प्रकट होते; अशा वेळी ग्रामव्यवस्था संग्रामाच्या चौकात निधडेपणाने उभी राहते. देशमुखांची ही कविता या अर्थाने मातीतला अंगार आहे.
‘अथक’ परिश्रम करूनही ज्यांच्या पदरात मात्र दगड आणि मातीच बांधली जात आहे; अशा निष्ठावान माणसांच्या दैनंदिन जगण्यातून उमटणारा विद्रोह हा या कवितेच्या मुळाशी साठलेला आहे. म्हणूनच केशव सखाराम देशमुख यांची कविता मराठी कवितेच्या प्रांतात स्वतंत्र मुद्रा कोरणारी ठरलेली आहे. ‘अथक’मधील संपूर्ण कविता ग्रामीण लढाऊ माणसांच्या जीवनाचे संघर्षशील आणि सत्यवादी समूहचित्र धाडशीपणाने दमदार स्वरूपात साकार करते. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours