त्या मातेनं तरी किती दुःख सोसायचं. भीमा विलायतेला होता तेव्हा तिनं रात्रंदिवस प्रपंचाची काळजी वाहिली. त्याची वकिली सुरू होईपर्यंतसुद्धा शेणाचा भार डोक्यावर वाहायला तिला कमीपणा वाटला नाही. दारोदार शेणाच्या गोवर्या विकायलाही ती लाजली नाही. थकली नाही, दमली नाही. स्वत: वाट्टेल तेवढे कष्ट उपसत राहिली. कधी पोटभर जेवली नाही. कुटुंबासाठीच कष्ट करीत राहिली. अशा या ममताळू, सुशील व पूज्य मातेच्या वाट्याला तरी असं अघोरी दुःख यायला नको होतं. देव तरी किती दुष्ट. अशाच पुण्यवान माणसांच्या पाठीशी लागतो. त्यांच्यासमोर दुःखाचे डोंगर उभे करतो. या देवाला देव तरी का म्हणावं आणि कसं म्हणावं?
जो त्याला मनापासून मान देतो, त्याचाच तो घास घेतो. मग देव आहे की देव नावाचं थोतांड? दुःखाअंती सुख असते, असे म्हणतात; पण आंबेडकर घराण्याला मात्र दुःखच दुःख सोसावे लागत होते. यानंतर कितीही सुख मिळाले तरी सोसलेल्या दुःखाची किंचितही भरपाई होणार नव्हती. झालेली हानी भरून निघणार नव्हती. काहींच्या दुःखाला निदान सीमा तरी असतात; पण या घराण्याच्या दुःखाला सीमाच नव्हती. त्यांचे दुःख म्हणजे अथांग समुद्र होता. त्यांच्या दुःखाने आकाशसुद्धा भरून गेले तरीही त्यांचे दुःख उरतच राहिले. या दुःखाच्या मागे समाजव्यवस्थेचा, आर्थिक विवंचनेचा वणवा होता; तरीही ध्येयवादाची महत्त्वाकांक्षा होती. कष्टाअंती विश्रांती हवी असते; पण तीही या कुटुंबाला नव्हती. अविश्रांत कष्ट करूनही पोटातील भुकेचा वणवा शमविता येत नव्हता. कच्चीबच्ची मुले भुकेने व्याकूळ होत होती. औषधपाण्याविना गंगाधरसारखं लाडकं बाळ मरणाच्या दारी गेलं. आई – बापाचं हृदय किती विदीर्ण झाले असेल, चाळणीच्या छिद्रांसारखे.
राष्ट्रउभारणीसाठी अनेक राष्ट्रपुरुष आणि समाजपुरुषांचं कार्य महत्त्वाचं असतं. राष्ट्रासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या अशा महामानवाची गाथा इतिहास जतन करीत असतो. म्हणूनच राष्ट्रपुरुषांच्या कार्याची व विचारांची ओळख नव्या पिढीला प्रेरणादायी ठरत असते. कोणत्याही राष्ट्रात बालके ही संपत्ती असते. या संपत्तीच्या समृद्धीसाठी त्यावर संस्काराची आवश्यकता असते. असे संस्कार कुटुंब, परिवार, शिक्षण, सोबती आणि उत्तम साहित्य करत असते. बालकथा, बालकादंबऱ्या, परीकथा, विज्ञानकथा, मनोरंजनपर साहित्यासोबत चरित्रवाङ्मयही महत्त्वाचे आहे. शंकर कऱ्हाडे हे समकालीन बालसाहित्य लेखनातले महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांनी उत्तम बालसाहित्य जाणीवपूर्वक लिहिले आहे. मुलांवर चरित्रलेखनातून संस्कार व्हावेत हा त्यांचा लेखनविशेष आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, डॉ. हेडगेवार या चरित्रग्रंथांतून वाचकांना प्रेरणा मिळू शकेल. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours