करप्रणाली, कृषिव्यवस्था, वैयक्तिक मालमत्तेची सुरक्षितता, शासनाचे आर्थिक नियंत्रण अशा अनेक संकल्पनांचा ऊहापोह कौटिल्याने केला आणि शोषणविरहित, आत्मोन्नतीस प्राधान्य देणारे व सर्वांचे सार्वकालिक कल्याण साधणारे अर्थशास्त्र कौटिल्याने विशद केले. त्याने भारतीय समाजाच्या मूळ आधारांनाच प्रबळ बनविले होते. धर्म, अर्थ आणि काम या त्रिवर्गाच्या संतुलनावर आधारित अर्थरचना समाजहितैषी, प्रबळ आणि समर्थ राहील, हे कौटिल्याचे मूळ संकल्पन आहे. ‘सुखस्य मूलं धर्मः धर्मस्य मूलं अर्थः’, ‘दया धर्मस्य जन्मभूमी’, ‘धर्मेण जयति लोकान्’ ही सर्व कौटिल्यीय सूत्रे म्हणजे समाजाच्या आचरणाची सूत्रे आहेत. कौटिल्याने अर्थशास्त्रातही याच सूत्रांना मूलभूत सूत्रे मानले आहे.
नीतिमत्ता, धर्म आणि अर्थशास्त्र अशी ही सांगड म्हणजे समृद्धीला नीतिमत्तेची बैठक प्राप्त करून देण्याचा सिद्धांत होय. कौटिल्याचे अर्थशास्त्र हे समृद्धीचे शास्त्र आहे; परंतु या समृद्धीला मूठभरांच्या श्रीमंतीचे स्वरूप येऊ नये, याकडे कौटिल्यीय अर्थशास्त्राचा कल झुकलेला आहे. यातून कौटिल्याच्या दूरगामित्वाचा प्रत्यय येतो. कौटिल्याने राष्ट्रनिर्मिती हा समाजशास्त्रीय सिद्धांत आहे, असे म्हटले आहे. समाजाच्या संघटित प्रयासाचे ते फलित आहे.
केवळ सैन्यशक्तीचा विकास करून नव्हे, तर समाजाच्या एकात्मिक प्रयासाने राष्ट्रनिर्मिती साध्य होत असते. ‘Nations live in war and die in peace’ असे मानणाऱ्या विचाराचे फोलपण कौटिल्याने सिद्ध केले आहे. समृद्धीला नीतिशास्त्राचा पाया असला पाहिजे. ‘धर्मोविहीनः पशुएवं भवति’ यावर कौटिल्याचे विवेचन आधारित आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र, सामाजिक न्यायशास्त्र, कररचना, कृषिशास्त्र, नैतिक आधारावरील राज्यरचना आणि सर्वजनहिताय प्रयास या सर्वांचे आकलन सद्यःस्थितीच्या प्रकाशात करण्याची नितांत आवश्यकता आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours