*गढ्यांच्या वास्तूस्थापत्याचा सहज सोप्या भाषेत व रंगीत छायाचित्रांद्वारे परिचय करून देणारे महाराष्ट्रातील गढ्यांवरील पहिले विस्तृत पुस्तक!*
'गढी' म्हणजे गावातील, सुभ्यातील किंवा परगण्यातील प्रतिष्ठित, मुख्य व्यक्तीची राहण्याची, तटबुरुजांनी सुरक्षित असलेली किल्लेसदृश, किल्लेवजा वास्तू; मग ती व्यक्ती जमिनदार, जहागीरदार, वतनदार, देशमुख-देशपांडे, पाटील किंवा एखादा बडा सरदारही असू शकतो.
उदाहरण द्यायचे झाल्यास पुण्याजवळील सासवडमध्ये असणारी सरदार पुरंदरे यांची गढी. छत्रपती शाहू महाराजांच्या राजवटीत पेशवे असलेले बाळाजी विश्वनाथ भट यांचे ते निकटवर्तीय होते. शिक्रापूर-चाकण महामार्गावर असलेल्या पिंपळे जगताप या गावात जगताप पाटलांची देखणी गढी आहे. नगर जिल्ह्यातील राशीनजवळ असलेली कुळधरण गावची गढी जहागीरदारांच्या मालकीची आहे. सोलापूर व धाराशिव यांच्या शीवेवर असलेल्या हिवर्डा आणि कळंबवाडी येथील गढी मुंडे या वतनदारांच्या मालकीच्या आहेत. गढी या वास्तूला काही मंडळी वाडा संबोधतात, तर बऱ्याच वेळा वाड्यांना गढी म्हणून ओळखले जाते.
मी माझ्या गेल्या काही वर्षांतील भटकंतीमुळे गढी या वास्तुरचनेची मूळ संज्ञा बनवण्याचा प्रयत्न केला. वाडा, गढी आणि भुईकोट किल्ला यातला नेमका फरक मी उदाहरणासहित एका प्रकरणात मांडला आहे. तटबुरुजांची तजवीज करून येणाऱ्या शत्रूचा अटकाव करण्यासाठी किंवा त्यावर मारा करण्यासाठी तटबुरुजांमध्ये तशी लढाऊ योजना केली असेल, तर अशी निवासाची वास्तू गढी म्हणून ओळखली जाते. काही अपवादात्मक वाड्यांच्या बांधकामामध्ये अशी योजना आढळून आली. वाचकांना गढी हा वास्तुप्रकार समजून घेताना गढीचे लढाऊ महत्त्वही समजून देण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेत विपुल प्रमाणात झालेली गड-दुर्गांची निर्मिती असंख्य पुस्तकांच्या माध्यमातून आपणांस परिचित आहे. परंतु तेवढ्याच संख्येने महाराष्ट्रातील गावोगावी उभ्या असलेल्या किल्लेसदृश गढ्या पुण्यातील तरुण दुर्गप्रेमी श्री. प्रविण महादेव हरपळे यांनी त्यांच्या अनुभवी भटकंतीतून वाचकांसमोर आणल्या आहेत. ऐतिहासिक ठेवा आणि महत्त्व असलेली गढी ही दुर्लक्षित वास्तू काळाबरोबर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आपल्या पूर्वजांनी स्वरक्षण हेतूने निर्माण केलेली वास्तू प्रसंगी गावचे रक्षण करण्यातही पुढे येत होती. एखाद्या भुईकोट प्रमाणे दिसणारी ही वास्तू म्हणजे गावागावातील छोटेखानी किल्लेच, हे वाचकांना या पुस्तकाच्या माध्यमातून लक्षात येईल.
आपला इतिहास हा फक्त भूतकाळ नाही तर तो आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक वास्तूंचा अमूल्य खजिना आहे. ऐतिहासिक तसेच तत्कालीन राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या या गढ्यांच्या वास्तूस्थापत्याचा सहज सोप्या भाषेत व रंगीत छायाचित्रांद्वारे परिचय करून देणारे महाराष्ट्रातील गढ्यांवरील हे पहिले विस्तृत पुस्तक आहे.
वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अर्थात क्यू. आर. कोडच्या माध्यमातून पुस्तकात वर्णन केलेल्या सर्व १०३ गढ्यांचे अचूक व नेमके स्थान आपणांस माहिती पडते.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours