श्रीमद्भगवद्गीतेप्रमाणे श्रीकबिरांचे दोहेदेखील नित्यनूतन म्हणून हिंदू, आणि मुस्लीम या दोन्ही धर्मातील लोकांना शतकानुशतके भावत आले आहेत. डॉ. विजय बाणकर यांनी कबिरांच्या वरवर सोप्या वाटणाऱ्या दोह्यांचे सखोल अर्थ उलगडून दाखविले आहेत. कबिरांचे दोहे यौगिक अनुभूतीची डूब असणारे आहेत आणि पारंपरिक भक्ती, नामोच्चार करणे, मूर्तिपूजा, उपास, तीर्थक्षेत्र यांच्याशी त्यांचा नाममात्र संबंध आहे, असे त्यांचे ‘कबीरविचार’ वाचताना स्पष्ट होत जाते.
हे या पुस्तकाचे धार्मिक चर्चेतील सर्वात मोठे योगदान वाटते. देवविषयक साद्यंत अनुभव घेण्याबाबत मार्गदर्शन करणारी दोन ठळक उदाहरणे ‘कबीरविचार’मध्ये आहेत. डॉ. बाणकर यांनी चार रामांचा दोहा घेऊन रामाची चारही रूपे साधार विशद केली आहेत. सफल तीर्थयात्रेवाबतची प्रश्नोत्तरेदेखील वाचकास आत्मपरीक्षण करावयास लावतात.
श्रीज्ञानेश्वरांच्या ओवीप्रमाणे श्रीकबिरांच्या दोह्यांतील गूढ अर्थ खोलवर जाऊन बघितला की, अध्यात्म कशाला म्हणतात, हे समजू लागते. त्याबाबत संतांनी जे मराठीत सांगितले, तेच कबीर त्यांच्या मिश्र भाषेत सांगत आहेत. मराठी संत आणि कबीर एकच आध्यात्मिक संदेश मांडत आहेत, असे सांगणारे हे पुस्तक म्हणूनच महत्त्वाचे आहे. हेरंब कुलकर्णी (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व प्रथितयश लेखक) हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours