उर्मिलाताई मूळताच एक सृजनशील लेखिका आहेत आणि त्यांच्या लिखाणाची शैली खरोखर वाचनीय आहे. त्यांची भूमिका ही नेहमी एका जागृत, संवेदनशील दलित स्त्रीची असते, म्हणून त्या परखडपणे वर्तमानातील घडामोडींवर भाष्य करतात. ‘दलित पँथर चळवळ आणि रिडल्स इन हिंदुइझम'चा वाद, खैरलांजी हत्याकांड, या सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांचे स्वतःचे म्हणणे असते. लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि ते वावरले त्या जागा बघण्यातला आनंद त्या व्यक्त करतात. हे पुस्तक अलीकडील काही दशकांचा इतिहास एका वेगळ्या चष्म्यातून सहजपणे आपल्यासमोर मांडते. प्रगल्भतेबरोबरच वाचनीयतेची जोड घालते. --- डॉ. वंदना सोनाळकर निळा रंग अथांग आभाळाचा आणि दर्याचा. ही अथांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध या दोघांत उर्मिला पवार यांना गवसते. जीवनाच्या अस्तरासारखी त्यांना उब, आधार, बळ, धैर्य देत कायम सोबत करते. स्वीडनमधील जागतिक ग्रंथ जत्रेत लेखिकेला प्रश्न विचारला गेला, “दलित साहित्य म्हणजे काय आणि ते बुद्धिझमशी कसे निगडीत आहे?” त्याला सजगतेने थोडक्यात उत्तर देताना लेखिकेने दलित साहित्याचा गाभा उलगडणारी व्याख्याच सांगितली. ती म्हणाली, “जेव्हा अमेरिकेचा नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला तेव्हा आपले पहिले पाऊल चंद्रावर ठेवताना तो म्हणाला, ‘हे पाऊल एका माणसाचे नाही. एका देशाचे नाही. तर ही संपूर्ण मानवजातीची उंच झेप आहे.' त्याप्रमाणे दलित साहित्य हे एका माणसाचे नाही. एका देशाचे नाही. तर ही संपूर्ण मानव जातीची उंच झेप आहे. मानवतेसाठी... आणि मानवता बुद्धिझमशी जोडलेली आहे.” व्यक्तीच्या जीवनातील बुद्ध धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धारणांचा असाही प्रत्यय 'निळे आभाळ सोबतीला' या पुस्तकातून येतो. -- अरुणा बुरटे
Pickup available at HO
Usually ready in 24 hours