'पानिपत १७६१'. कै. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्या या मराठी ग्रंथाची पहिली आवृत्ती एकतीस वर्षांपूर्वी प्रकाशित झाली. त्यानंतर आता त्या ग्रंथाची ही दुसरी आवृत्ती प्रसिद्ध होण्याचा योग आलेला आहे. गेल्या तीस वर्षांत आपल्या देशातील राजकीय व सामाजिक परिस्थिती खूपच झपाट्याने बदलली आहे. आजच्या बदललेल्या परिस्थितीमध्ये पानिपत युद्धाचे, तसेच त्या युद्धाच्या संदर्भात या दुसऱ्या आवृत्तीचे महत्त्व काय ते सांगणे आवश्यक आहे.
शिवछत्रपती व पानिपतचे तिसरे युद्ध ही मराठी माणसाची दोन प्रेरणास्थाने आहेत. शिवछत्रपतींचे स्फूर्तिदायित्व त्यांच्या असामान्य व्यक्तित्वामुळे व कर्तृत्वामुळे समजू शकते. पण पानिपतचे काय? पानिपत लढाई ही काही शिवछत्रपतींप्रमाणे मराठ्यांची यशोगाथा नव्हे. उलट त्या लढाईतील पराभवाने मराठी मनावर केलेली खोलवरची जखम आजही ताजी आहे. पण अचंब्याची गोष्ट म्हणजे, आजच्या मराठी माणसाला मराठ्यांच्या अनेक रोमांचकारी विजयांपेक्षा पानिपतच्या पराजयाचेच अधिक आकर्षण वाटत आलेले आहे. हा वदतोव्याघात नसून प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे. सुमारे सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी कै. राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी
कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती
या कवनाने आरंभ होणारी कविता रचली तेव्हापासून मराठी मनात निर्माण झालेले पानिपताकर्षण आजवर कायम टिकून आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours