महाराष्ट्रातील संतसाधूंची मालिका फार मोठी आहे. त्यात संत तुकाराम यांचे नाव श्रेष्ठ कनिष्ठ वर्षीय सर्व आबालवृद्धांत गेली तीनसाडेतीनशे वर्षे सारखेच सर्वतोमुखी दुमदुमून राहिले आहे. "पराविद्ये" च्या किंवा "परम" धर्माच्या क्षेत्रात योगमार्गाच्या मंदिरावर तुकोबांनी भक्तियोगाचा साधा पण तेजस्वी कळस चढविला आहे. योगातील श्रेष्ठ स्थान सुलभतेने प्राप्त करून देणारे, आणि सर्वांस व सरसि मोकळे असलेले, हे सहजसाध्य साधन तुकोबांनी आपल्या अनुभवाने मुमुक्षूस पटवून दिलेले आहे. या अनुभवपूर्ण मार्गदर्शनाचा ठेवा त्यांच्या "अभंगवाणी"त अमाप साठविलेला आहे. चिरकाल लुटित राहिल्यानेही तो अधिकाधिक सकस व अक्षय असल्याचा निर्वाळा मिळत आहे. स्वात्मानुभवाचा हा ठेवा म्हणजेच एक सामाजिक उच्च संस्कृतीचा प्रभावी आदर्श होय. वेदप्रणित आर्य संस्कृतीच्या तत्त्वज्ञानाची प्रगमनशील आणि अद्यावत् सामाजिक आचारधर्माची ही एक उच्च पातळी आहे. या तत्त्वज्ञानाची संपूर्णतः ओळख करून घ्यावयाची असेल तर या थोर तत्त्ववेत्त्याच्या चरित्राच्या अभ्यासाने त्यामागील पार्श्वभूमी समजून घेणे अपरिहार्य आहे.
- वा. सी. बेंद्रे -
Pickup available at HO
Usually ready in 24 hours