अवचित नि अयाचित योगाने गाडगेबाबांचे हे परम पवित्र सगुण चरित्र लिहिण्याची कामगिरी मजवर सोपवण्याची श्री. बाबांची लहर लागली. बाबांचे चरित्र महासागरासारखे अफाट नि विशाल हकिकतीचे, आठवणींचे नि भक्तजनांकडून आलेल्या नानाविध गोष्टींचे कितीतरी कागदपत्र माझ्यासमोर उभे. किती घ्यावे नि कोणते टाकावे, समजे ना. गांगरून गेलो मी! प्रथम, तपशीलवार विस्तृत मोठे चरित्र लिहिण्याची योजना. ते काम सावकाशीने चालले असतानाच, एक दिवस निरोप आला. “फुलवात तेवत आहे तोवर तिच्या उजेडात काय पाहायचे ते पाहून घ्यावे, केव्हा वारा येईल नि ती विझेल, याचा काय नेम ? ” या निरोपाने मी तर चरकलोच. चला, मोठे नाही तर छोटे. पण माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वाचकांच्या विचारांना चालना देणारे पुस्तक शक्य तितक्या झटपट लिहून बाहेर काढण्यासाठी बसलो टाइपरायटर खडाडवीत. बाबांच्या शतपैलू चरित्रातील मुख्यमुख्य ठळक पैलू मी येथवर चित्रित केले. इंद्रधनुष्याप्रमाणे चित्ताकर्षक असणाऱ्या शेकडो नवलकथांचा समावेश करण्याचा मोह शिकस्तीने टाळावा लागला. एक तर लेखन मर्यादा आकुंचलेली आणि बाबांच्या निरोपातली ती निरांजन मला सारखी वाकुल्या दाखवीत सुटली. केली सेवा वाचकानी गोड मानून घेतली का त्यातच मला आनंद. अखेर, गंगेच्या पाण्याने पूजा, या न्यायाने ही चरित्र लेखनाची पत्री श्री. गाडगेबाबांच्या चरणा (अरे हो! पायाना तर ते हातही लावू देणार नाहीत.) बाबांच्या त्या कामधेनू गाडग्यांत साष्टांग प्रणिपाताने समर्पण करीत आहे. गरिबाची ही शिळीपाकी भाकरी आमटी बाबांनी रुचकर मानून दिलेला समाधानाचा देकर कानी पडला म्हणजे आयुष्याचे सार्थक मानणार- मुंबई नं.२८ केशव सीताराम ठाकरे महाशिवरात्र शके १८७३ ता. २३ फेब्रुवारी १९५२
Pickup available at HO
Usually ready in 24 hours