कवी ग्रेस यांचे ललितबंध आता वाचकांच्या परिचयाचे झाले आहेत. भाषेच्या नादावर्तात खेचून अखंड भूलभिंगरीप्रमाणे, वेगाने गरगरत एकाच बिंदूवर खिळवणारी, एकाच वेळी विलक्षण गतिमान व तितकीच स्थिर अशी त्यांची भाषाशैली, वाचकांना किती मोहक व आकर्षक वाटते त्याचे जितेजागते उदाहरण म्हणजे, अलीकडचेच त्यांचे व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे व्दिदल, दुधारी बंदिशीचे ('मैत्र जिवाचे' पासून ते 'ताऱ्यांच्या प्रहरापाशी पर्यंत.) कार्यक्रममालिकांचे, येथे गद्यच पद्यमय होते, शब्दकळा सूरमयी होते आणि संगीता ते तर शब्दब्रह्माच्या अनाहत नादाचेच आत्मरूप।
हे ललितबंध कधी पुराणकथांच्या, कधी दंतकथांच्या, कधी लोककथांच्या, कधी परीकथांच्या, कधी स्त्रीत्वाच्या आलंबन विभावांच्या तर कधी स्मरणकथांच्या किंवा अगदी प्रहर व ऋतुंच्याही अनुषंगाने, अखेर निर्मिती व निर्मितिप्रक्रिया, या घटनांचाच वेध घेतांना दिसतात. पण या घटना, मुळातूनच कायम नवनवे उखाणे घालत हुलकावण्या देणाऱ्या असल्यामुळे, या पाठलागाला ना आदि ना अंत... वेधाचीच अनंत वेधशाळा ही, कवी ग्रेस ह्यांचीच...
तरीही नेकीने, नेट लावून कवी ग्रेस, याच वेधशाळेतून, एखाद्या तपस्वी ताऱ्याची कुंडली शोधून काढतात आणि त्यांना जाणवलेले एखादे तत्त्व ठोसपणे मांडतात. 'वाऱ्याने हलते रान' या संग्रहातले, निर्मिती आणि निर्मितिप्रक्रियेच्या संदर्भात मांडलेले तत्त्व असे :- कला ही जीवनाची पुनर्निमिती आहे. थेट निर्मिती सदोष राहणारच, पुनर्निर्मिती सदोष राहणार नाही, तर तिचा कल अपर्यायी परिपूर्णतकडे झुकणारा असेल.... पूर्णाकृती पुनर्निर्माणाच्यासाठी, कलावंताला जीवनाची समग्र सामग्री, कृतज्ञतापूर्वक उचलूनही, जीवनाशीच कायमचे ताटातुटीचे, हेतुपूर्ण क्रूर अनुसंधान जुळवावे लागते."
Pickup available at HO
Usually ready in 24 hours